Ridván Messages
Marathi · Universal House of Justice
ज्या समुदायाची उच्च विचारसरणी आणि उच्च संकल्प त्यांच्या उच्च आवाहनासाठी योग्य आहेत अशा समुदायाला संबोधित करताना आम्हाला प्रचंड आनंद वाटतो. आमचे तुमच्यावरील प्रेम किती महान, किती उच्च कोटीचे आहे आणि बहाउल्लाह ह्यांच्या शिकवणुकीनुसार जीवन जगण्यासाठी आणि तहानलेल्या जगास त्यांच्या प्रकटीकरणाचे जीवनजल देण्यासाठी तुमचे प्रामाणिक आणि समर्पित प्रयत्न पाहताना आमचे आत्मे किती उंचावतात! तुमच्या हेतूची जाणीव स्पष्ट आहे. विस्तार आणि एकत्रीकरण, सामाजिक कृती आणि समाजाच्या संभाषणांमध्ये सहभाग वेगाने पुढे जात आहे, आणि समुदायसमूहाच्या पातळीवर या उपक्रमांची नैसर्गिक सुसंगतता अधिक दृश्यमान होत आहे. ज्या ठिकाणी वाढती संख्या अनेक प्रयत्नांमध्ये गुंतलेली आहे, तो प्रत्येक प्रयत्न धर्मश्रध्देची समाज-निर्माण शक्ती प्रसृत करण्याचे साधन आहे हे यापेक्षा अधिकपणे कोठेही स्पष्ट नाही.
नऊ वर्ष योजनेचा प्रारंभ झाल्यापासून त्या योजनेच्या पहिल्या बारा महिन्यांत, या जागतिक आध्यात्मिक उपक्रमाने मित्रांना कशा प्रकारे प्रेरणा दिली आहे आणि त्यांना प्रोत्साहन दिले आहे आणि विशिष्ट कृतींना चालना दिली आहे, हे पाहून आम्हाला आनंद झाला आहे. योजना अंमलात आणण्यावर त्वरित ज्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे ते सुनिश्चित करते की, प्रत्येक देश आणि प्रदेशात, तिसरा मैलाचा दगड पार केलेला किमान एक समुदायसमूह उदयास येईल: अस समूह जेथे मोठ्या संख्येने लोक एकत्र काम करत आहेत आणि गतिशील समुदायाच्या जीवनात योगदान देत आहेत. तथापि, या पंचवीस वर्षांच्या कालावधीसाठी जगातील प्रत्येक समुदायसमूहामध्ये सघन विकास कार्यक्रम स्थापित करणे हे उद्दिष्ट आहे, याची जाणीव ठेवून, श्रध्दावंतांनी धर्मश्रध्देसाठी नवीन समुदायसमूह उघडण्याचे तसेच ज्या समुदायसमूहामध्ये सघन विकास कार्यक्रम कार्यरत आहेत त्याजागी त्यांचे प्रयत्न तीव्र करण्याचे ठरवले आहे. जगाच्या सर्व भागांमध्ये आद्यप्रवर्तक निर्माण होण्याच्या संधीबद्दल उच्च जागरुकता आहे –अनेक समर्पित आत्मे या संधीला कशाप्रकारे प्रतिसाद देऊ शकतात यावर विचार करत आहेत आणि इतर अनेकांनी आधीच पदे भरली आहेत, लक्षणीयरीत्या स्थानिक स्तरावरच नव्हे तर वाढत्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील. हा अनेक मार्गांपैकी एक मार्ग आहे, ज्यामध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे, सर्वत्र मित्रांकडून परस्पर समर्थनाची भावना व्यक्त केली जात आहे. ज्या समुदायांमध्ये सामर्थ्य निर्माण झाले आहे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी –दुसऱ्या समूहात, प्रदेशात, देशामध्ये किंवा अगदी दुसऱ्या खंडात– होत असलेल्या प्रगतीला पाठिंबा देण्यासाठी स्वत:ला वचनबद्ध केले आहे आणि ते सर्जनशील माध्यमातून दुरून प्रोत्साहन देतात आणि आपला अनुभव थेट प्रकारे सामायिक करण्यास सक्षम करतात. यादरम्यान, समुदायसमूहामध्ये जे शिकले जात आहे ते नोंदून ठेवण्याच्या मूलभूत दृष्टीकोनाचा व्यापकपणे सराव केला जातो, जेणेकरून ते स्थानिक पातळीवर आणि इतरत्र केलेल्या योजनांना माहिती पुरवू शकेल. प्रशिक्षण संस्थेने दिलेल्या शैक्षणिक अनुभवाची गुणवत्ता कशी वाढवायची हे शिकण्यावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला. जेव्हा संस्थागत प्रक्रिया समुदायात रुजते तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत प्रभावशाली असतात. उदाहरणार्थ, सघन विकास कार्यकलापांची ती केंद्रे, जेथे तेथील रहिवासी प्रशिक्षण संस्थेला, जे त्यांचे ते एक स्वत:चे साधन आहे, एक शक्तिशाली साधन मानतात: असे साधन ज्याच्या उत्तम विकासासाठी त्यांनी स्वत: मुख्य
जबाबदारी स्वीकारली आहे. धर्मश्रध्देचे दरवाजे नेहमीच उघडे असतात हे चांगले जाणून, प्रवेश करण्यास तयार असलेल्यांना प्रोत्साहन कसे द्यावे हे श्रध्दावंत शिकत आहेत. अशा व्यक्तींबरोबर चालणे, आणि त्यांना उंबरठा ओलांडण्यास मदत करणे, हा एक विशेषाधिकार आणि विशेष आनंद आहे; प्रत्येक सांस्कृतिक संदर्भात, ओळखीच्या आणि आपुलकीच्या या अनुनाद क्षणाच्या गतिशीलतेबद्दल बरेच काही शिकण्यासारखे आहे. आणि हे एवढेच नाही. जरी सामाजिक परिवर्तनामध्ये योगदान देण्यासाठी अनेक समुदायसमूहांचे प्रयत्न त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत तरी, राष्ट्रीय आध्यात्मिक सभा, नेहमीप्रमाणे सल्लागारांच्या सक्षम सहाय्याने, हे प्रयत्न समुदाय-निर्माण प्रक्रियेतून कसे उद्भवतात याबद्दल अधिक सक्रियपणे शिकण्याचा शोध घेत आहेत. लोकांच्या सामाजिक आणि भौतिक कल्याणाच्या विकासाबाबत चर्चा, कुटुंबांच्या गटांमध्ये आणि समुदायांमध्ये केली जात आहे, तर मित्र त्यांच्या जवळच्या परिसरात उलगडत असलेल्या अर्थपूर्ण चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याचे मार्ग शोधत आहेत.
आम्ही वर्णन केलेल्या सर्व गोष्टींमध्ये, तरुणांच्या कृती दैदीप्यमान आहेत. प्रभावाचे केवळ निष्क्रीय शोषक असण्यापासून दूर –मग तो प्रभाव सौम्य असो किंवा अन्यथा– त्यांनी स्वतःला योजनेचे धाडसी आणि विवेकी नायक सिद्ध केले आहे. जिथे एका समुदायाने त्यांना या प्रकाशात पाहिले आणि त्यांच्या प्रगतीसाठी परिस्थिती निर्माण केली, तिथे तरुणांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाचे समर्थन केले आहे. ते त्यांच्या मित्रांसोबत धर्मश्रद्धेविषयी माहिती सामायिक करत आहेत आणि सेवेला अधिक अर्थपूर्ण मैत्रीचा पाया बनवत आहेत. वारंवार, अशी सेवा स्वतःहून लहान असलेल्यांना शिक्षित करण्याचे स्वरूप धारण करते –त्यांना केवळ नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षणच देत नाहीत, तर अनेकदा त्यांच्या शालेय शिक्षणातही मदत करतात. संस्थेच्या प्रक्रियेला बळकटी देण्याची पवित्र जबाबदारी पार पाडणारे बहाई तरुण आमच्या आकांक्षा पूर्ण करत आहेत.
या सर्व प्रयत्नांच्या मांडणीमागे एक अत्यंत अस्वस्थ असे युग आहे. समाजाच्या सध्याच्या काळातील संरचना, मानवतेच्या सध्याच्या त्रासांमध्ये त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास तयार नसल्याची व्यापक मान्यता आहे. बर्याच प्रमाणात जे निश्चित आणि अचल मानले जात होते त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आणि परिणामी हे अस्वास्थ्य एकसंध दृष्टीची उत्कंठा निर्माण करत आहे. एकता, समानता आणि न्याय यांच्या समर्थनार्थ उठवलेले आवाज हे त्यांच्या समाजासाठी किती आकांक्षा बाळगतात हे दर्शविते. अर्थातच, आशिर्वादित सौंदर्याच्या (बहाउल्लाह) अनुयायांसाठी हे आश्चर्यकारक नाही की त्यांनी मांडलेल्या आध्यात्मिक आदर्शांप्रत अंतःकरणाची तळमळ असावी. परंतु तरीही आम्हाला हे उल्लेखनीय वाटते की, ज्या वर्षात मानवजातीच्या सामूहिक प्रगतीची शक्यता क्वचितच अंधुक दिसली, त्या वर्षात सुमारे दीड दशलक्ष लोक उपस्थित असलेल्या दहा हजारांहून अधिक संमेलनांमध्ये धर्मश्रध्देचा प्रकाश, त्याच आदर्शांचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित करून आश्चर्यकारक तेजाने चमकला. बहाउल्लाह ह्यांचा दृष्टीकोन, आणि जगाच्या उन्नतीसाठी मानवजातीला एकात्मतेने कार्य करण्याचा त्यांचा उपदेश, हा तो केंद्रबिंदू होता ज्याभोवती समाजातील विविध घटक उत्सुकतेने एकत्र आले होते –आणि यात आश्चर्य नाही, कारण अब्दुल-बहांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, “या दिव्य शिकवणींमध्ये जगाचा प्रत्येक समुदाय आपल्या उच्चतम अभिलाषांची पूर्तता पाहतो.” मानवतेचे काही हितचिंतक प्रथम बहाई समुदायाकडे आश्रयस्थान, ध्रुवीकृत आणि पक्षाघात झालेल्या जगाचे आश्रयस्थान म्हणून आकर्षित होऊ शकतात. तरीही एका आश्रयस्थानाच्या पलीकडे, त्यांना जे दिसून येते, ते म्हणजे सुविचारी व्यक्तिंचा गट एकत्र येऊन, जग नव्याने उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
या संमेलनांच्या भौगोलिक विस्ताराद्दल बरेच काही लिहिले जाऊ शकते, त्यांनी नवीन योजनेला दिलेल्या असाधारण प्रेरणेबद्दल किंवा त्यांनी दिलेला आनंद आणि उत्साह उपस्थित असलेल्यांकडून कसा उद्युक्त केला गेला त्याबद्दल. तथापि, या काही ओळींमध्ये आम्ही धर्मश्रध्देच्या विकासाबद्दल त्यांचे काय वैशिष्ठ्य होते त्याकडे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. ते बहाई समुदायाचे प्रतिबिंब होते जो नातेसंबंध पाहतो, फरक नाही. या दृष्टिकोनामुळे ज्या मेळाव्यात सर्वांचे स्वागत होते तिथे नऊ वर्षांच्या योजनेविषयी विचारविमर्श करणे स्वाभाविक होते. मित्रांनी केवळ व्यक्ती आणि कुटुंबांच्याच नव्हे तर स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांच्या सहवासात योजनेच्या त्यांच्या समाजावरील परिणामांचा विचार केला. एकाच ठिकाणी इतक्या लोकांना एकत्र आणून जगभर उलगडत असलेल्या आध्यात्मिक आणि सामाजिक प्रगतीबद्दल परिवर्तनशील संभाषणास पोषक अशी परिस्थिती त्यामुळे निर्माण झाली. अशा संमेलनांचे विशेष योगदान –एकाच वेळी मोकळे, उत्थानकारी आणि उद्देशपूर्ण– समुदायसमूह विकासाचा एक विस्तारित नमुना बनवू शकतो हा एक मौल्यवान धडा बहाई संस्थांनी भविष्यासाठी लक्षात ठेवावा.
आणि म्हणून श्रध्दावंतांचा समूह योजनेच्या दुसर्या वर्षात नवीन दृष्टीकोनातून आणि ते काय साध्य करू इच्छितात याच्या सखोल अंतर्दृष्टीसह प्रवेश करत आहे. समाज निर्माण घडवणाऱ्या शक्तीच्या प्रकाशात पाहिल्यास त्या किती वेगळ्या कृती दिसतात! या विस्तारित आशेमुळे एक शाश्वत गतिविधी एका विखरलेल्या सेवेच्या कृतीपेक्षा किंवा केवळ आकडेवारीपेक्षा जास्त काही पाहण्याची अनुमती देते. जागोजागी, ज्या उपक्रमांचा पाठपुरावा केला जात आहे त्यातून जनगण स्वतःच्या विकासाच्या मार्गावर परिचलन करण्याची जबाबदारी कशी घ्यावी हे शिकत आहे. परिणामी आध्यात्मिक आणि सामाजिक परिवर्तन लोकांच्या जीवनात विविध मार्गांनी प्रकट होत आहे. योजनांच्या मागील श्रृंखलेत, ते आध्यात्मिक शिक्षण आणि सामूहिक उपासनेच्या प्रचारामध्ये सर्वात स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. योजनांच्या या नवीन श्रृंखलेमध्ये, समुदायाचे जीवन उन्नत करणाऱ्या इतर प्रक्रियांकडे वाढत्या श्रेणीने लक्ष देणे आवश्यक आहे –उदाहरणार्थ, सार्वजनिक आरोग्य सुधारणे, पर्यावरणाचे रक्षण करणे किंवा कलेच्या सामर्थ्याचा अधिक प्रभावीपणे वापर करणे. समुदायाच्या हिताच्या या सर्व पूरक बाबींना पुढे जाण्यासाठी जे आवश्यक आहे ते म्हणजे, अर्थातच, या सर्व क्षेत्रांमध्ये पद्धतशीर शिक्षणात गुंतण्याची क्षमता –अशी क्षमता जी दैवी शिकवण्यांमधून निर्माण होणारी अंतर्दृष्टी आणि व्युत्पन्न केलेल्या मानवी ज्ञान संचयनाच्या वैज्ञानिक चौकशीवर आधारित आहे. ही क्षमता जसजशी वाढत जाईल, तसतसे येत्या काही दशकांत बरेच काही साध्य होईल.
या विस्तृत, समाज निर्माण दृष्टीचे दूरगामी परिणाम आहेत. प्रत्येक समुदाय त्याच्या पूर्ततेच्या मार्गावर आहे. परंतु एका ठिकाणच्या प्रगतीमध्ये बहुतेकवेळी दुसऱ्या ठिकाणच्या प्रगतीची वैशिष्ट्ये सामाईक असतात. एक वैशिष्ट्य म्हणजे, जसजशी क्षमता वाढते आणि स्थानिक किंवा राष्ट्रीय समुदायाची शक्ती वाढते, तसतसे, वेळेच्या पूर्णतेत, आमच्या रिझवान २०१२ च्या संदेशात नमूद केलेल्या मश्रिकुल-अधकारच्या (बहाई उपासना मंदिर) उदयासाठी आवश्यक असलेल्या अटी अखेरीस पूर्ण होतील. आम्ही तुम्हाला गेल्या वर्षीच्या रिझवान संदेशात सांगितल्याप्रमाणे, बहाई उपासना मंदिर उभारण्याची ठिकाणे आम्ही वेळोवेळी ठरवू. यावेळी, कांचनपूर, नेपाळ आणि म्विनिलुंगा, झांबिया येथे स्थानिक उपासना मंदिराच्या स्थापनेसाठी आवाहन करताना आम्हाला आनंद होत आहे. यापलीकडे, आम्ही टोरंटो, कॅनडामध्ये दीर्घकाळ प्रस्थापित राष्ट्रीय हझरतुल-कुद्सच्या परिसरात, राष्ट्रीय उपासना मंदिर उभारण्याचे आवाहन करत आहोत. या प्रकल्पांना, आणि भविष्यात सुरू केल्या जाणाऱ्या इतर प्रकल्पांना, प्रत्येक भूमीतील मित्रांनी मंदिर निधीला दिलेल्या योगदानाचा निश्चितच फायदा होईल.
परमदयाळू परमेश्वराने आपल्या प्रियजनांना बहाल करण्यासाठी निवडलेले आशीर्वाद भरपूर आहेत. उदात्त आहे आवाहन, भव्य आहे संभावना. आपल्या सर्वांना सेवा देण्यासाठी तातडीच्या वेळेला बोलावण्यात आले आहे. तेव्हा, तुमच्या वतीने आणि तुमच्या अथक परिश्रमांसाठी, आम्ही बहाउल्लाह यांच्या उंबरठ्यावर भावपूर्ण अंत:करणाने प्रार्थना करतो.